रत्नागिरी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यंदाही रत्नागिरीत ‘पुलोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आठ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‘स्वर आणि स्वरांकित सुहृद ही पुलं आणि सुनीताबाईंच्या प्रेमाची स्थाने, तर काव्य आणि नाटक हे हळवे कोपरे. याच मर्मस्थानांची गुंफण यंदाच्या पुलोत्सवात आहे,’ असे आर्ट सर्कलतर्फे सांगण्यात आले.
आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्वरांकित पुलं’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांसारख्या अनेक कलाकारांबरोबर पु. ल. देशपांडे यांचे ऋणानुबंध होते. ते अधोरेखित करणारा हा कार्यक्रम आहे. यात अभिषेक काळे आणि आदित्य मोडक हे गायक सहभागी होणार असून, पं. विश्वनाथ कान्हेरे (ऑर्गन) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची साथ असेल. अनघा मोडक निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
न ऐकलेल्या कवितांची मुक्त मैफल नऊ नोव्हेंबरला सादर होणार आहे. ‘इर्शाद’ असे त्या कार्यक्रमाचे नाव असून, संदीप खरे आणि वैभव जोशी त्यात कविता सादर करणार आहेत.
समारोपाच्या दिवशी, १० नोव्हेंबर रोजी ‘निरूपण’ हे संगीत नाटक सादर होणार आहे. हे नाटक ‘रंगपंढरी’ निर्मित आणि ईश्वर अंधारे लिखित-दिग्दर्शित आहे. दर्जेदार आणि तगडी संहिता असलेले आणि मधुर गीते असलेले हे नाटक पुण्यात होणाऱ्या आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्येही सादर होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुलोत्सव तरुणाई आणि कृतज्ञता सन्मानही प्रदान होणार आहेत. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहेत.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेची पार्श्वभूमी यंदाच्या ‘पुलोत्सवा’ला आहे. ‘पुलोत्सवा’तील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.